राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. काँग्रेसकडून तसा प्रस्तावही देण्यात आल्याचा दावा विविध स्तरांवर केला जात होता. मात्र या सर्व चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणत्याही स्तरावर चर्चा झालेली नाही. आमदार, खासदार किंवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्याशी काँग्रेसकडून संपर्क साधलेला नाही. तसेच आमच्याकडूनही कोणाशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नाही.
विलीनीकरणाची चर्चा नेमकी कुठून सुरू झाली आणि ती कोणी सुरू केली याची कल्पना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्याकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून त्यांनीही कोणालाही असा प्रस्ताव दिलेला नाही, असे सुळे यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरही भाष्य केले. ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत, त्या बैठकीत काय चर्चा झाली हे फक्त त्या दोघींनाच माहीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि पेपरफुटीसारखे गंभीर प्रश्न देशासमोर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी एकमेकांशी संघर्ष करण्याऐवजी देशासमोरील प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
“देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. आज राजकारण करण्यापेक्षा देश वाचवण्याची गरज अधिक आहे,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र सुप्रिया सुळे यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.








